नाशिकमध्ये उद्यापासून सरकारी, राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नाशिक : कोरोनाच्या तिसरी लाट, डेल्टा व्हेरिएंट आणि रुग्णसंख्येतील वाढ या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केलीय. भुजबळ यांनी आज नाशिकमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निर्बंधांची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये उद्यापासून सरकारी, राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या 73 लाख आहे. आतापर्यंत 12 लाख 81 हजार नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 3 लाख 80 हजार लोकांनी दुसरा डोसही घेतलाय. बाकी लोकांची लसीकरण अद्याप झालेलं नाही. ऑगस्टमधील पहिल्या आठवड्यापर्यंत लसीचा साठा सुरळीत होईल. तसंच ऑक्सिजनचं उद्दिष्टही जास्त ठेवलं आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिलीय.
गावात रुग्ण सापडला तर शाळा बंद होणार
जिल्ह्यातील 8 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील एक महिन्यात ज्या गावात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही, अशा गावात शाळा सुरु होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 24 शाळांपैकी कोरोनामुक्त 335 गावातील 296 शाळा सुरु होत आहे. एका बाकड्यावर एकच मुलगा बसेल. शाळांना नियम पाळावे लागतील. गावात रुग्ण सापडला तर शाळा बंद होणार, असंही भुजबळ यांनी सांगितलं.
सर्व कार्यक्रमांवर उद्यापासून बंदी
जिल्ह्यातील राजकीय, सरकारी आणि सामाजिक कार्यक्रम उद्यापासून बंद करण्यात येत आहे. फक्त ऑनलाईन कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल. दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु राहतील. त्यापेक्षा जास्त वेळ त्यांना देता येणार नाही. त्याचबरोबर विकेंडला जमावबंदीचे आदेश लागू असतील. सध्यस्थितीमुळे निर्बंध शिथिल होणार नाही. उलट अधिक कडक केले जातील, असे संकेतही भुजबळ यांनी यावेळी दिले आहेत.
नाशिकमध्ये पाणी कपातीचा निर्णय
अद्याप पाऊस समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. अशावेळी प्रत्येक भागातील प्रशासकीय अधिकारी योग्य तो निर्णय घेतील अशा सूचना दिल्या आहेत. नाशिकमध्ये पाऊस नसल्यामुळे त्याचा परिणाम मुंबईच्या पाणीसाठ्यावर होणार असल्याचंही भुजबळ म्हणाले. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक आठवड्याला गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहील. धरणात 50 टक्के पाणीसाठी होण्यापर्यंत हा निर्णय लागू असेल, अशी माहिती भुजबळ यांनी दिलीय.

