जुन्या भांडणाचा राग, तरुणावर भर दुपारी गोळीबार, बीड हादरलं! थरार सीसीटीव्हीत कैद

0 झुंजार झेप न्युज

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदुपारी गोळीबार करण्यात आला. मात्र तरुणाचे दैव बलवत्तर असल्याने तो बचावला.

बीड : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदुपारी गोळीबार करण्यात आला. मात्र तरुणाचे दैव बलवत्तर असल्याने तसेच त्याने वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारातून त्याचे प्राण वाचले आहेत. संबंधित घटना ही काल (16 जुलै) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. हा सर्व घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधी हुज्जत घातली नंतर गोळीबार

मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर आहे. तिथेच त्याचे बांधकाम साहित्याचे दुकान आहे. दरम्यान काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास या दुकानासमोर पवन गावडे हा थांबला होता. यावेळी याठिकाणी दोन तरुण दुचाकीने आले. यावेळी त्यांनी पवन याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी ‘जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे’, असं म्हणत पवनशी हुज्जत घातली.

पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पवन गावडे गुन्हा मागे घेणार नाही म्हणाल्यानंतर आरोपीने त्याला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने पवनच्या डोक्याला पिस्तूल लावून गोळी झाडली. यावेळी पवनने सतर्कता दाखविल्याने पिस्तूलमधून सुटलेली गोळी त्याच्या डोक्याला चाटून गेली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार आणि अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यात कुख्यात गुंडावर गोळीबार

बीडमध्ये काल दुपारी संबंधित गोळीबाराची घटना ताजी असताना काल संध्याकाळी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एका कुख्यात गुंडावर गोळीबार करुन हत्या केल्याची घटना समोर आली. नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर (वय 41) याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित गोळीबाराची घटना ही संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेला. त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.