पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठ्यासाठी तातडीने उपाय करा-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

0 झुंजार झेप न्युज

•भिवंडी तालुक्यातील 34 गावांमध्ये

ठाणे,दि.13 : स्टेम प्रकल्पाद्वारे भिवंडी तालुक्यातील 34 गावांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पाहणी करून उपाय योजना करण्याचे निर्देश केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिले.

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील 34 गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, ठाणे महानगरपालिकेचे सहआयुक्त संदीप माळवी, स्टेम प्रकल्पाचे महाव्यवस्थापक संकेत घरत यांच्यासह 34 गावांचे सरपंच व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, स्टेम पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यापासून त्याचा विस्तार झाला नाही. आजही भिवंडी तालुक्यातील 34गावांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होतो. तसेच या योजनेद्वारे 34 गावांसाठी 41 एमएलडी पाणी आरक्षित असताना केवळ 11 एमएलडी पाणी देण्यात येते. हे पाणीही नियमित नसल्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊन महिलांना अडचणी निर्माण होतात. काही गावांना पाणीच पोचत नाही तर काही गावांना अपुरा पाणी पुरवठा होतो. या गावांना पुरेशा प्रमाणात व योग्य दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी स्टेम प्रकल्पाच्या महाव्यवस्थापकांनी येत्या आठ दिवसात पाहणी करून उपाययोजना करावेत.

स्टेम प्रकल्पातील 34 गावांना अपुरा पाणी पुरवठा होत असतानाही पाणी देयके मात्र मोठ्या प्रमाणात येतात. तसेच थकीत देयकांवर व्याज लावले गेले आहे. हे व्याज माफ करण्यासंदर्भात विचार करण्यात यावा. गावापर्यंत पाणी आल्यानंतर अंतर्गत वितरणाची व्यवस्था ठाणे जिल्हा परिषदेने करावी. तसेच जलजीवन मिशनमधून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देता येईल का याचाही विचार करावे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. 

स्टेम कंपनीचे महाव्यवस्थापक श्री. घरत यांनी या गावांमध्ये प्रत्यक्ष पाणी करून पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी विविध गावांच्या सरपंच व लोकप्रतिनिधींनी पाणी मिळण्यासंदर्भातील अडचणी मांडल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.