जिल्हाधिका-यांकडून लसीकरण, समृद्धी महामार्ग, कौंडण्यपूर विकासकामांची पाहणी

0 झुंजार झेप न्युज

लसीकरण पूर्णत्वास न्यावे जिल्हाधिका-यांचे आरोग्य पथकांना निर्देश

अमरावती,दि.16: विशेष मोहिमेदरम्यान आरोग्य पथकांनी प्रयत्नपूर्वक लसीकरणाचे प्रमाण वाढविले. मात्र, संपूर्ण लसीकरण होणे अत्यावश्यक असून पथकांनी जोरदार प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज धामणगाव रेल्वे येथे दिले.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी आज धामणगाव रेल्वे, तसेच कौंडण्यपूर येथे भेट देऊन लसीकरण मोहिम, महसूल यंत्रणेची कामे, समृद्धी महामार्गाची कामे आदींचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार प्रदीप शेलार यांच्यासह गटविकास अधिकारी, महसूल अधिकारी, कर्मचारी, तालुका आरोग्य यंत्रणेचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिका-यांनी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयाला भेट देऊन महसूलविषयक कामांचा आढावा घेतला. त्यांनी अशोकनगर येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन आरोग्य पथकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मोहिमेत पथकांनी हिरीरीने लसीकरणाचा टक्का वाढवला, हे निश्चितच प्रशंसनीय आहे. अद्यापही कोविडचे रूग्ण आढळणे, ओमायक्रॉनचा राज्यातील प्रादुर्भाव आदी बाबी पाहता संपूर्ण लसीकरण ही काळाची गरज आहे. त्यामुळे मोहिमेचा जोम कमी होता कामा नये.

समृद्धी महामार्गाची पाहणी

जिल्हाधिका-यांनी धामणगाव तालुक्यातील आसेगाव येथे भेट देऊन समृद्धी महामार्गाच्या कामांची पाहणी केली. संरक्षित भिंतीमुळे पारंपरिक वाटांमध्ये अडथळे आल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुषंगाने शेतकरी बांधवांच्या वहिवाटीसाठी निर्माण करण्यात येत असलेल्या अंडरपासेस व पर्यायी रस्त्यांच्या कामांची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली.  

कौंडण्यपूर विकासकामांची पाहणी

जिल्हाधिका-यांनी कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन दर्शन केले. त्यानंतर त्यांनी विकास आराखड्यातील कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशीही संवाद साधून विविध बाबींची माहिती घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.