घरोघरी तिरंगा उपक्रमातंर्गत तिरंगा झेंडा विक्री केंद्राचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते शुभारंभ.
जालना, दि. 28:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना योग्य दरामध्ये झेंडा विकत घेता यावा यादृष्टीने जिल्हाभरात झेंडा विक्री केंद्र सुरु करण्यात येत असुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरु करण्यात आलेल्या तिरंगा झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आला.
यावेळी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, अग्रणी बँक अधिकारी प्रेषित मोघे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक उमेश कहाते, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, उपजिविका विकास अधिकारी प्रविण काथे, लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती मिनाक्षी घायाळ, छाया निकाळजे आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरु करण्यात आलेले झेंडा विक्री केंद्र हे सुट्टीचे दिवस वगळता सकाळी 10.00 ते सायं. 6.00 या वेळेत सुरु राहणार असुन प्रती झेंडा 30 रुपये एवढी किंमती असणार आहे. जालना जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरावर तसेच प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या कार्यालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकवून या महोत्सवात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी केले.

