• सर्व जाती धर्मियांना राष्ट्रीय ऐक्याच्या धाग्यात जोडणाऱ्या भारतीय संविधानाचा आम्हाला अभिमान
लखनौ दि.06: सर्व जाती धर्मियांना राष्ट्रिय ऐक्याच्या धाग्याने जोडणारे भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी परिपूर्ण संविधान देशाला देऊन जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही अधिक मजबूत केली आहे. जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाचा आम्हाला अभिमान आहे. सर्वांनीच संविधानाचा सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.लखनौ येथील अवध शिल्प ग्राम मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य संविधान सन्मान रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उदघाटक म्हणून मार्गदर्शन करताना ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइं चे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या रॅलीस उत्तर प्रदेशातील संविधानप्रेमी जनता आणि रिपाइं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधानाचा सन्मान करतात. मात्र काँग्रेस आणि विरोधी आघाडी चे लोक मोदींना बदनाम करण्यासाठी संविधान बदलणार अशी अफवा पसरवून दलित समाजात गैरसमज पसरवत आहेत.समाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेस करीत आहे. काँग्रेसनेते मोदींवर अर्वाच्य भाषेत तोंडसुख घेत आहेत.मात्र आगामी निवडणुकीत मोदींना जनतेचा बहुमताचा कौल मिळेल आणि काँग्रेसचे नेते तोंडावर अपटणार आहेत. मोदींना शिव्या शाप देणाऱ्या काँग्रेसवाल्यांचे थोबाड जनता मतपेटीतून फोडणार आहे असा टोला ना.रामदास आठवले यांनी लगावला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधान पूजक; संविधान समर्थक आणि संविधानाचा सन्मान करणारे नेते आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध स्मारकाची कामे मोदींनी करून दाखवली आहेत.काँग्रेसने मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्याची जेंव्हा जेंव्हा वेळ आली तेंव्हा तेंव्हा काँग्रेसने पाठ दाखवली आहे. त्यामुळे काँग्रेस संविधान बदलले जाईल म्हणून जे आश्रू ढाळत आहे ते मगरीचे अश्रू आहेत.काँग्रेस खोटा खोडसाळ प्रचार करीत आहे. आम्ही जो पर्यंत मोदींच्या मंत्रिमंडळात आहोत तो पर्यंत संविधानाला कोणी हात लावू शकत नाही.मोदी तर संविधानाचे समर्थक आहेत असे ना.रामदास आठवले म्हणाले.
उत्तर प्रदेशात भाजप सोबत आरपीआय ची युती असून लोकसभेची एक जागा आरपीआय मिळावी यासाठी भाजप शी आरपीआयची बोलणी सुरू आहे.उत्तर प्रदेशात आता बीएसपी चा जनाधार कमी होत आहे.उत्तर प्रदेशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढत आहे. आज संविधान रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाल्या बद्दल ना.रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले.

