बेंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यातील दुसरा सामना जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर आता तिसरा निर्णायक सामना बेंगळुरू इथं होणार आहे. मालिका विजयासाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे.
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया सहज मालिका जिंकेल असं वाटत होतं पण दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कमबॅक केलं. राजकोटमध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे मधल्या फळीतील फलंदाजी या सामन्यात महत्वाची ठरली.
दुसऱ्या सामन्यात जसा फलंदाजीचा क्रम होता तसाच तिसऱ्या सामन्यात असण्याची शक्यता आहे. राजकोटमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला उतरले होते तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि श्रेयस अय्यर चौथ्या नंबरवर खेळला होता.
दरम्यान, रोहित शर्माला राजकोटमध्ये क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. मात्र, कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा राजकोटवर खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे धवनला पॅट कमिन्सचा चेंडू लागला होता. त्यानंतर तो सामन्यातून बाहेर गेला होता. दोन्ही खेळाडू दुखापतीतून सावरत आहेत आणि त्यांच्या खेळण्याबद्दल सामन्याआधी निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआय़ने म्हटलं आहे.
गोलंदाजीत युझवेंद्र चहलला कुलदीप यादवसोबत खेळण्याची संधी मिळू शकते. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केलेल्या बुमराहने राजकोटमध्ये एका बाजुने दबाव राखला. मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांनी अखेरच्या षटकांत योग्य मारा केला.
भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन संघ जास्त बदल करण्याची शक्यता कमी आहे. मार्नस लब्युशेनने पहिल्या सामन्यात चुणूक दाखवली. मिशेल स्टार्कने गेल्या सामन्यात दहा षटकांत 78 धावा दिल्या पण तो निर्णायक सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. पॅट कमिन्स आणि अॅडम झाम्पा भारताच्या फलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकतात.

