अहमदनगरःसाईबाबांची शिर्डी आजपासून बेमुदत बंद राहणार आहे. हा निर्णय ग्रामसभेत शनिवारी घेण्यात आला. मात्र साई मंदिर भक्तांसाठी खुले राहणार असल्याचंही सांगण्यात आलं. साईबाबांच्या जन्मस्थळाच्या मुद्दयावरून शिर्डी आणि पाथरीतील गावकऱ्यांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. दरम्यान या बंदचा साईभक्तांना कोणताही त्रास होणार नसल्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी शिर्डी ग्रामस्थांची भेट घेणार आहेत.
या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत. साईबाबांचे जन्मस्थळ कोणते यावरून शिर्डीकर विरूद्ध पाथरीकर साईभक्त असा वाद पेटला असून याप्रश्नी रविवारी शिर्डी आणि परिसरातील 25 गावे बंद ठेवण्याच निर्णय ग्रामस्थ आणि साईभक्तांनी घेतला.
परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील साईबाबा जन्मस्थळातील सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केल्यावर हा वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात साईंची जन्मभूमी पाथरी असल्याचं विधान केल्यानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांचं दाखला देत परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील ग्रामस्तांनी साईबाबांचा जन्म पाथरी येथे झाला असून, ते ब्राम्हण होते, असा अपप्रचार सुरू केला आहे.
Maharashtra: A bandh has been called today in Shirdi town, against CM Uddhav Thackeray's reported comment calling Pathri (in Parbhani) as Sai Baba's birthplace.
73 people are talking about this
साईबाबांच्या जन्मस्थळावरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी मंत्रालयात बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व संबंधित व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच मुख्यमंत्री सोमवारी शिर्डी आणि पाथरी ग्रामस्थांची बैठक घेणार आहेत. त्यांच्या आश्वासनानंतर पाथरीवासीयांनी आपला बंद मागे घेतला. मात्र शिर्डी बंदचा निर्णय कायम आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी साई जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे घेऊन स्पष्टीकरण द्यावे, असं आवाहन माजी विरोधी पक्षनेते आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. बंद काळात साईमंदिर, प्रसादालय, भक्तनिवास, रूग्णालये, मेडिकल या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. हार- फुलांची आणि अन्य दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स मात्र बंद असतील.


