पुणे प्रतिनिधी :
पुणे | इंदापूर तालुक्यात वाळू तस्करांनी अक्षरशा हैदोस माजवला आहे. पोलीस प्रशासन व महसुलासोबत साटेलोटे करुन तालुक्याच्या विविध भागतून तब्बल कोट्यावधींच्या गौण खनिजाचा खुलेआम उपसा सुरू आहे. आता तर या तस्करांनी हद्द पार केली आहे. वाळू तस्करी करताना किरकोळ वादातून एका कोळी कुटुंबाला तलवार, लोखंडी गज, जंब्या आदींचा धाक दाखवत बेदम मारहण केल्याबाबतची तक्रार पीडित कुटूंबाकडून करण्यात आली आहे.
इंदापूर तालुक्यातील निरा-नरसिंहपूर या गावात ही घटना घडली. चोरुन वाळू नेताना नरसिंहपूर गावातील विजेच्या खांबाला तो अडकला व त्यातून वादाची ठिणगी पेटली. यावेळी खांबाच्या कडेलाच राहणाऱ्या दत्तात्रय बबन कोळी व त्यांच्या कुटुंबाला या वाळू तस्करांनी बेदम मारहाण केली.
या संदर्भात अक्षय संजय गोडसे, योगेश संजय गोडसे, संजय रामदास गोडसे व इतर तिघे असा सहा जनाविरुध कलम 354/327/504/506 व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र कोळी कुटुंब पुरते भयभीत झाले आहे. त्यांच्याकडून प्रशासनाकडे मदतीची हाक दिली जातेय. अशा घटना राजरोसपणे गावागावातून घडत आहेत. प्रशासन केवळ कारवाया दाखवते मात्र कारवाईचा धाक, कायदाचं भय या तस्करांना उरलेच नाही. त्यामुळे पोलीस व महसूल विभागावर प्रश्नचिन्ह उभा राहतेय.

