काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा

0 झुंजार झेप न्युज

शेतकरी आंदोलनाला 60 दिवस पूर्ण होऊनही कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यातच 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्याचा निर्धार केला आहे.

नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाला 60 दिवस पूर्ण होऊनही कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यातच 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी तर कोणती तर काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा निघत नसल्याचा दावा केला. मात्र, ही अदृश्य शक्ती कोणती? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

शेतकरी आंदोलनाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्रसिंह तोमर यांनी मीडियाशी संवाद साधून हा आरोप केला. कोणती तरी अदृश्य शक्ती आहे. त्यांनाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघू नये असं वाटतं. नाही तर आमच्याशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांनी वेगळाच राग अळवला नसता, असा दावा तोमर यांनी केला.

शेतकऱ्याशी चर्चा करण्यास तयार

शेतकऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने नोटीस बजावली आहे. त्यावर तोमर यांना पत्रकारांनी छेडले असता कोणत्याही गोष्टीचा शेतकरी आंदोलनाशी संबंध लावू नका, असं ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास आम्ही नेहमीच तयार आहोत. जेव्हा पंजाबमध्ये शेतकरी रेल्वेरुळावर उतरून आंदोलन करत होते, तेव्हापासूनच त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेला कोणतीही ठेच पोहोचणार नाही, याची आम्ही काळजी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

आंदोलनासाठी 365 दिवस आहेत

26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय उत्सव आहे. आंदोलनासाठी 365 दिवस पडले आहेत. शेतकरी त्यांच्या रॅलीची ताकद कधीही दाखवू शकतात. त्यामुळे 26 जानेवारी रोजी त्यांनी रॅली काढणं योग्य नाही. शेतकऱ्यांनी इतर कुठल्या तरी दिवशी रॅलीचं आयोजन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला रॅलीचं आयोजन केलं तरी या आंदोलनात शिस्त पाळली जाईल, याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच सरकारला कोणताही ईगो नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.