मरण स्वस्त झालंय का? तीन घटना, 47 जणांचा मृत्यू, जबाबदारी कोणाची?

0 झुंजार झेप न्युज

एकीकडे कोरोनाचा वाढता आकडा, दुसरीकडे कोरोनामुळे होणारे मृत्यू तर तिसरीकडे विविध दुर्घटनेमुळे गमवावे लागणारे जीव...यामुळे मरण स्वस्त झालं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई : आज कधी, कुठे, कसा कोणाचा जीव जाईल काहीही सांगता येत नाही. एकीकडे कोरोनाचा वाढता आकडा, दुसरीकडे कोरोनामुळे होणारे मृत्यू तर तिसरीकडे विविध दुर्घटनेमुळे गमवावे लागणारे जीव…यामुळे मरण स्वस्त झालं का? असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या महिनाभरात मुंबईसह महाराष्ट्रात तीन दुर्घटना घडल्या. या तिन्ही दुर्घटनेत एकूण 47 जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्व दुर्घटनेला जबाबदार कोण? निष्पाप लोकांचा मृत्यू होतो, त्यांच्या कुटुंबियांच्या जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात घडलेल्या मोठ्या दुर्घटना 

🛑विरारमधील कोव्हिड रुग्णालयात आग, 13 जणांचा मृत्यू🛑

मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील आज (23 एप्रिल) अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून 13 जणांना प्राण गमवावे लागले. तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग लागली, त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. हॉस्पिटलबाहेरील रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.


🛑नाशिकमध्ये ऑक्सिजन पुरवठ्या अभावी 24 जणांचा मृत्यू🛑

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची घटना 21 एप्रिलला घडली. या दुर्घटनेत ऑक्सिजनअभावी एकूण 24 जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकमधून गळती झाल्याने हजारो लीटर लिक्वीड स्वरुपातील ऑक्सिजन वाया गेले. यावेळी रुग्णालयात अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील 150 जण व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी 25 जणांचा तडफडून मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळं नोझल तुटून ही ऑक्सिजन गळती झाली.

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिलला दुपारी 12.30 च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन भरण्याचे काम सुरु होते. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनानं धावपळ केली. मात्र, यावेळी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा त्रास झाला आणि यामध्ये 24 जणांना जीव गमावावा लागला.

भांडूपच्या ड्रीम मॉलमधील रुग्णालयाला आग, दहा जणांचा मृत्यू

भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला 26 मार्चला रात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते.

या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून रुग्णालयातील 61 जणांना सुखरूप बाहेर काढलं. आगीत अडकलेल्या चार जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता. तब्बल 11 तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर 

या तिन्ही दुर्घटनेत 47 जणांना जीव गमवावा लागलाय. या 47 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी आता कोण घेणार? यातील काही रुग्ण बरे होते, त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार होते. मात्र हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून काही ना काही मदत केली जाईल. जखमींनाही मदत मिळेल. घटनेची सखोल चौकशीही होईल. कारवाई केली जाईल….. पण त्या कुटुंबातील मरण पावलेला व्यक्ती पुन्हा परतणार आहे का? त्या कुटुंबाची आर्थिक गरज यापुढे पूर्ण होईल का? असे एक ना अनेक प्रश्न त्या कुटुंबापुढे उभे आहे. त्यामुळे आता तरी या दुर्घटनेचे राजकारण न करता राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भर देण्याची गरज आहे. ज्यामुळे किमान यापुढे होणाऱ्या दुर्घटना टळतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.