स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे.
पंढरपूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर आधी शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा, ज्यांचे रोजगार बुडणार आहेत त्यांना भरपाई द्यावी. तरच लॉकडाऊन करावा. हे जमत नसेल तर आम्हाला आमच्या नशीबावर सोडून द्या. आमचं आम्ही पाहून घेऊ, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांचा प्रचार करण्यासाठी राजू शेट्टी आले होते. त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी लॉकडाऊनला जोरदार विरोध केला. आधी शेतमालाला किंमत द्या, मगच लॉकडाऊन करा. ज्यांचा रोजगार बुडणार आहे त्यांना भरपाई द्या. ज्यांचा व्यवसाय बुडाला त्यांना भरपाई द्या. मग लॉकडाऊन करा. आमचं काही म्हणणं राहणार नाही. नुसताच लॉकडाऊन करतो म्हणणं योग्य नाही. त्यापेक्षा सरकारनं आम्हाला आमच्या नशीबावर सोडावं. आमचं आम्ही पाहून घेऊ, असं राजू शेट्टी म्हणाले.
कोरोनाच्या बजेटमध्ये भ्रष्टाचार
लॉकडाउन काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. 4 रुपयांची मास्क 40 रुपये विकला जातो. हे नेमकं काय आहे, हे सरकारनं सांगावं, असं ते म्हणाले. गेल्या वर्षीचे बजेट कोरोनासाठी वापरले त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
महाविकास आघाडीची भूमिका अमान्य
दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडला. शेट्टी यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार टीका केली. महाविकास आघाडीतिल प्रमुख तीनही पक्षाची भूमिका पटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
अटीतटीची लढत
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडे भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे. तर स्वाभिमानीने सचिन पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

