पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असतानाच हिंसेचं गालबोट लागलं.
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असतानाच हिंसेचं गालबोट लागलं. कुचबिहारच्या शीतलकुचीमध्ये सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले आहेत. मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या आनंद बर्मन या 18 वर्षीय तरुणाला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे. मतदान शांततेत पार पडावं म्हणून तैनात असलेल्या सीआयएसएपच्या जवानांचे शस्त्र हिसकावून घेण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्यामुळे जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सीआयएसएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात पाचही तरुणांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप टीएमसीने केला आहे. पाचही मृतदेह माथाभांगा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा अहवालही मागवला आहे. मात्र, आयोगाला मिळालेल्या माहितीनुसार सीआएसएफच्या जवानांनी गोळीबार केल्याने त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय उपनिवडणूक आयुक्त सुदीप जैन यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून शीतलकुचीमधील गोळीबाराची माहिती घेतली आहे. तसेच गोळीबार करण्यात आला तेव्हा काय परिस्थिती होती, गोळीबार का करावा लागला, गोळीबार करणं गरजेचं होतं का? याबाबतची माहिती जैन यांनी मागितली आहे. तसेच घटनास्थळाची व्हिडीओ रेकॉर्डिंगही मागवण्यात आली आहे.
टीएमसीचा आरोप
दरम्यान, या हिंसेनंतर टीएमसीने एक प्रेस रिलीज जारी करून आरोपांवर आरोप केले आहेत. सकाळापासून भाजपचे कथित कार्यकर्ते लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत. तसेच सीआरपीएफचे जवान भाजपला मतदान करण्यासाठी दबाव टाकत आहेत. शीतलकुचीच्या माथाभंगा ब्लॉक-1च्या बुथ क्रमांक 126 वर ही घटना घडली आहे, असं टीएमसीने म्हटलं आहे. तर, शीतलकुची येथील गोळीबारप्रकरणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. विशेष पोलीस पर्यवेक्षक यांनी हा अहवाल तयार केला आहे. दोन गटांमध्ये हिंसा भडकली होती. त्यांना पांगवण्यासाठी सीआएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. या जवानांच्याकडील शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. पोलिंग अधिकाऱ्यालाही मारहाण करण्यात आली होती, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
पाच जिल्ह्यांत मतदान
राज्यातील हावडा, दक्षिण 24 परगना, हुगली, कुचबिहार आणि अलीपुरद्वार या पाच जिल्ह्यातील 44 जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात एकूण 15,940 पोलिंग बूथ आहेत. मतदान सकाळी 7 वाजता सुरू झालं असून संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत असणार आहे. चौथ्या टप्प्यात एकूण 373 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 1,15,81,022 मतदार या उमेदवारांच्या भविष्याचा फैसला करणार आहेत. यात 58,82,514 पुरुष आणि 56,98,218 महिला मतदार आहेत. तसेच तृतिय पंथीयांची संख्या 290 आहे.

