जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार, असं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय.
इंदापूर (पुणे) : जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार, असं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. ते इंदापूर इथे बोलत होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. त्यादरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी काही काळ थांबले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.
हे सरकार अजून किती दिवस टिकेल असा प्रश्न पत्रकारांनी रामदास आठवले यांना विचारला. त्यावर रामदास आठवले म्हणाले, “हे राज्य सरकार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंत चालेल”
तसेच सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून, महाराष्ट्राची बदनामी देशभर झाली आहे असं, रामदास आठवले म्हणाले.
पंढरपूर पोटनिवडणूक
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडे असा थेट सामना होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भरीरथ भालके यांनाच तिकीट देण्यात आलंय. तर परिचारक गटाने मंजुरी दिल्यानंतर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेलीय. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरले अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.
सचिन वाझे यांना न्यायालयीन कोठडी
तब्बल 27 दिवस एनआयएच्या कोठडीत असलेले निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 23 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालीयन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष एनआयए कोर्टाने दिले आहेत. अँटालिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. त्यांना सलग दोन दिवसांच्या कसून चौकशी नंतर 14 मार्च रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना एनआयच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. ते तब्बल 27 दिवस एनआयएच्या कोठडीत होते.

