महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यापाठोपाठ आता मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. उद्या दुकाने सुरुच राहतील. मात्र, आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे.
मुंबई : महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यापाठोपाठ आता मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. उद्या दुकाने सुरुच राहतील. मात्र, आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असे आवाहन विरेन शाह यांनी मुंबई व्यापारी संघामार्फत केले आहे.
बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, शेतकऱ्यांना पाठिंबा
आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मात्र, उद्या दुकाने सुरु राहतील. आम्ही सरकारला आवाहन करतो की या बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका. कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरु झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणंसुद्धा जिकरीचं जालं आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, असे विरेन शाह यांनी सांगितले. मुंबई व्यापार संघाची भूमिका त्यांनी माडली आहे.
ठाण्यातही महाराष्ट्र बंदला विरोध
तर दुसरीकडे मुंबईनंतर ठाण्यातील काही व्यापारी संघटनांनीदेखील महाराष्ट्र बंदला विरोध केला आहे. या व्यापारी संघटनांनी आमचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नसल्याचं सांगितलं आहे. कोरोनाकाळात व्यापार बंद असल्याने आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगत ठाण्यात काही संघटनांनी ही भूमिका घेतली आहे.
पुण्यात दुकाने बंद न ठेवण्याची भूमिका
राज्यातील महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र, पुण्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद न ठेवण्याची भूमिका घेतलीय. सोमवारी दुकाने सुरुच ठेवली जातील. मात्र, शेतकऱ्यांच्या मृत्यूचा निषेध म्हणून आम्ही काळ्या फिती लावू, असं येथील व्यापाऱ्यांनी म्हटलंय. कोरोना काळात व्यापार बंद राहिल्याने सध्या दुकाने बंद ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, असं पुणे जिल्हा रिटेल संघानं सांगितलंय. संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी याविषयी अधिक माहिती दिलीय.
महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा बंदला पाठिंबा
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल (9 ऑक्टोबर) तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.
