जालन्यात ईएसआयसीचे रुग्णालय उभारण्यासाठी अधिकाधिक कामगारांची नोंदणी करा- पालकमंत्री राजेश टोपे
जालना,दि.22: ईएसआयसीच्या रुग्णालयातुन कामगारांना कॅशलेस पद्धतीने अत्यंत चांगले उपचार दिले जातात. या रुग्णालयातुन उपचार घेत असताना वैद्यकीय खर्चाची कुठलीही मर्यादा नसल्याने हे रुग्णालय जालना येथे उभारण्यासाठी अधिकाधिक कामगारांची नोंदणी करुन घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
जालना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र पाटील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. नार्वेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.,
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, केंद्र शासनाच्या अखत्यारित असेलेले कर्मचारी राज्य बिमा निगम ईएसआयसी हे कामगारांना विविध सेवा, सुविधा देण्याचे काम करते. ज्या जिल्ह्यामध्ये 30 हजारापेक्षा अधिक कामगारांनी ईएसआयसीमध्ये नोंदणी केलेली आहे अशा ठिकाणी या मजुरांसाठी सर्व सुविधांनीयुक्त असे रुग्णालय उभारण्यात येते. जालना जिल्ह्यात मोठी औद्योगिक वसाहत असुन या ठिकाणी हजारो कामगार काम करतात. जालन्यामध्ये ईएसआयसीचे रुग्णालयाची उभारणी झाल्यास कामगारांना अत्यंत चांगल्या आरोग्य सेवा मोफत स्वरुपात उपलब्ध होणार असल्याने या कामास प्राधान्य देण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.
जालना जिल्हा हा लसीकरणात राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांच्या यादीमध्ये येईल यादृष्टीने नियोजन करत जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी कोरोनामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढु नये यासाठी जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्यात यावी. लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
