•तृतीयपंथियांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार- पालकमंत्री राजेश टोपे
जालना,दि.2:जालना शहरातील गांधी चमन परिसरात असलेल्या जिल्हा महिला रुग्णालयात तृतीय पंथीयांसाठी कोव्हीड लसीकरण केंद्राचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथियांनी या कोव्हीड लसीकरण केंद्रावर येऊन लस टोचुन घेण्याचे आवाहन करत तृतीयपंथियांच्या असलेल्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी राजेंद्र जाधव, विश्वंभर भुतेकर, सतीष होंडे, शेख महेमूद, ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापुरकर, सत्यशोधिका मुक्ता साळवे महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदा पवार ,गणेश चांदोडे ,अजय केळगंद्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांच्यासह तृतीय पंथीयांची उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, तृतीयपंथियांसाठी मुंबईनंतर जालन्यात कोव्हीड लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला असुन जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथियांनी या ठिकाणी येऊन लस घेण्याचे आवाहन करत तृतीयपंथियांचे अनेक प्रश्न आहेत. आरोग्याच्या सुविधा, स्मशानभूमी, राहण्यासाठी घरे नाहीत अशा अनेक अडचणी आहेत. तृतीयपंथियांच्या असलेल्या अडचणी कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगत त्यांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याची सोयही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तृतीयपंथियांना समाजात सन्मानाची वागणुक मिळणेही तेवढेच गरजेचे असुन समाजातील प्रत्येकाने तृतीयपंथियांना माणुसकीची वागणुक देण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
