औरंगाबाद जिल्ह्याकडे पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करणार- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

0 झुंजार झेप न्युज

•पंतप्रधानांनी देशातील मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी यांच्याशी साधला संवाद

•औरंगाबादेत विविध उपक्रम राबवुन लसीकरणाचे उद्दिष्ट होणार पूर्ण

औरंगाबाद,दि.3 : औरंगाबाद जिल्हा पर्यटनासाठी प्रसिध्द असल्याने याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावार लसीकरण करावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचविले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबवुन लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार , इतर राज्याचे मुख्यमंत्री तसेच विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरद्ष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

लसीकरणाविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन कवच कुंडल अभियान’ राबवून लसीकरण वाढविले आहे. ‘मन में है विश्वास’ हा कोरोना विरूध्दच्या लढाईत मनोबल वाढविणारा उपक्रम आम्ही राबविला. या कार्यक्रमात विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते तसेच आर्मीचा देखील सहभाग होता. हा कार्यक्रम यापुढेही सुरू राहणार असून त्याची व्याप्ती अधिक वाढविण्यात येईल. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या 25 गावांना विशेष निधी देणार आहोत. शहरी तसेच ग्रामीण भागासाठी ‘मेरा वार्ड सौ प्रतिशत टीकाकरण वार्ड’, ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’ असे वेगवेगळे प्रयोग करून जिल्ह्यात लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.