कृषीपंपाची सक्तीने विजबिल वसुली थांबवा- बाळासाहेब ढाकणे.
पाथर्डी तालुका प्रतिनिधी: कोरोनाची महामारी तसेच गारपीठ व अतीवृष्टी यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या विजबिलाची सक्तीने वसुली सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची सक्तीची विज बिल वसुली महाराष्ट्र शासनाने किमान एक वर्ष थांबवावी व शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडू नये, याबाबतचे आदेश महावितरण कंपनीस द्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे अहमदनगर दक्षिण सरचिटणीस शेतकरीनेते बाळासाहेब ढाकणे यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासन उद्योजकांना पूर्णवेळ पुर्ण क्षमतेने विजपुरवठा करते, परंतू शेतकऱ्यांना विजपुरवठा रात्रीच्या वेळी सोडला जातो. कार्यलयाच्या वेळा थंडीमुळे उशीरा सुरू केल्या आहेत. मग माझ्या शेतकऱ्यांना थंडी वाजत नाही का ? तसेच रात्रीच्या वेळेस जीव धोक्यात घालुन शेतकऱ्यांना शेतीचे दारे धरावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी लागणारी विज महावितरण कंपनीने पुर्ण क्षमतेने दिवसा किमान बारा तास सोडवण्याबाबत महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीस आदेश द्यावेत व शेतकरी वर्गाची पिळवणूक थांबवून त्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी बांधवांच्या समवेत शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी युनीयन व भाजपा किसान मोर्चा रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र शासनास शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी दिला आहे.
