मानवत तालुक्यातील रत्नापुर येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व सामाजिक समता अंतर्गत कार्यक्रम संपन्न
परभणी,दि.14: भारत देश ज्या संविधानावर चालतो त्या संविधानास स्वातंत्र्य, समता, बंधुता नागरीकांमध्ये आत्मियतेने आली पाहिजे असे अभिप्रेत आहे. त्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावातील नागरीकांनी एक गाव एक स्मशानभूमीसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.मानवत तालुक्यातील रत्नापुर येथे दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता अमृतमहोत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता अंतर्गत अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याची जनजागृती हा कार्यक्रम जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर शहर पोलीस प्रमुख अविनाश कुमार, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी,तहसीलदार सारंग चव्हाण, शासकीय अभियोक्ता डी.यु.दराडे ,पोलीस निरीक्षक बनसोडे,नायब तहसीलदार नकुल वाघुंडे, सरपंच सचिन दोडके,अँड. भारत चिलवंत यांची उपस्थिती होती.महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.
यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या की,सर्व सुविधा मिळण्यासाठी व आत्मनिर्भरपणे जगण्यासाठी प्रत्येकाने कायद्याचा लाभ घेतला पाहिजे पण कायद्याचा कुठेही गैरवापर होता कामा नये, ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे आणी ती प्रत्येकाने पार पाडावी. रत्नापुर या गावात मागील काही दिवसात अनुसूचित जाती अत्याचार बाबत अनेक प्रकरणे घडली त्यामुळे हे गाव संवेदनशील गावाच्या यादीत आले. पण येथील सर्व धर्म समभावाचे वातावरण पाहुन मी समाधानी झाले. पण आगामी काळात रत्नापुरसह सर्वच गावातील ग्रामस्थांनी एक गाव एक स्मशानभूमीसाठी पुढाकार घेतला तर अनेक समस्या कमी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.तसेच आयुष्यात प्रत्येकाने थोर महापुरूषाचे आत्मचरित्र वाचुन ते आचरणात आणले पाहिजे असे त्या म्हणाल्या.यावेळी शासकीय अभियोक्ता डी.यु.दराडे यांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली.

