'स्वर सागर'मुळे युवा कलावंतांना मिळाले हक्काचे व्यासपीठ - श्रावण हर्डीकर

0 झुंजार झेप न्युज

स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव उद्घाटन

स्वरसागर पुरस्कार पं. वेंकटेश कुमार तर युवा कलाकार पुरस्कार हिमांशू तांबे यांना प्रदान 

पिंपरी,पुणे,दि.07: पिंपरी चिंचवड फाउंडेशनने सुरू केलेला स्वर सागर सांस्कृतिक महोत्सव युवा कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून अनेक दिग्गज कलाकार तसेच नव्या पिढीतील होतकरू कलाकार यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले ही कौतुकाचे बाब आहे. पुणे, मुंबई व्यतिरिक्त अन्य शहरांमधील कलावंतांना आपली कला रसिक प्रेक्षकांपुढे सादर करण्यास मदत मिळते. स्वरसागर सांस्कृतिक कला महोत्सवामुळे उद्योग नगरीला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख मिळण्यास मदत मिळाली आहे, असे मत महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.

२६ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन श्रावण हर्डीकर, पं. व्यंकटेश कुमार, महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रविण तुपे, अनिल गालींदे, राजीव तांबे, हंबीर आवटे, उपस्थित होते. यावेळी २०२४ चा स्वरसागर पुरस्कार पं. व्यंकटेश कुमार तर युवा स्वरसागर पुरस्कार चिंचवड येथील हिमांशु तांबे यांना प्रदान करण्यात आला. 

   स्वरसागर महोत्सवाच्या संयोजनात पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, मल्लाप्पा कस्तुरे, मृगेश नटराजन, गजानन शंकर चिंचवडे, अनिल दराडे, अस्मिता सावंत आदींनी सहभाग घेतला.

   कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धा हर्डीकर - शिंदे यांच्या एकल कथक नृत्याविष्काराने झाली. त्यांनी सादरीकरणाची सुरुवात शिवस्तुतीने केली. त्यानंतर त्यांचे गुरू पं. राजेंद्र गंगानी यांनी रचलेल्या द्रुत बंदिश आणि तिहाईचे सादरीकरण केले. जयपूर, लखनौ आणि बनारस या तिन्ही घराण्यांच्या शैलीचा मिलाफ नृत्याविष्कारातून सादर केला. कृष्ण आणि गोपिका यांच्यावर आधारित विरह भाव असलेल्या ठुमरीने नृत्याची सांगता केली. त्यांना संवादिनी आणि गायनावर पुष्कराज भागवत, तबल्यावर, विवेक मिश्रा, सितारवर प्रतीक पंडित, कीबोर्डवर ओंकार अग्निहोत्री यांनी साथ केली.

किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. व्यंकटेश कुमार यांनी कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सादरीकरण केले. प्रारंभी राग यमन-कल्याण प्रस्तुत केला. या रागातील ख्याल आणि "हरवा मोरा रे" ही द्रुत बंदिश सादर केली. रसिकांनी त्यांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली. त्यानंतर बागेश्री रागातील पारंपरिक बंदिश "सखी मन लागे ना" आणि प्रसिद्ध द्रुत बंदिश "कौन करत तोरी बिनतिपी हरवा" प्रस्तुत केली. याबरोबरच सुमधूर "ये ग ये ग विठाबाई" या मराठी अभंगाने बहार आली. प्रेक्षकांच्या फर्माईशी नुसार कुमारजींनी "सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा" गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता भैरवी रागातील ठुमरीने केली. त्यांना संवादिनी साथ सुयोग कुंडलकर, तबला साथ भरत कामत यांनी केली.

प्रास्ताविक प्रवीण तुपे, सूत्रसंचालन प्रतिभा चव्हाण, आभार शिरीष कुंभार यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.