मुंबई प्रतिनिधी :
मुंबई | महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक प्रगत राज्य असून या पुढील काळात राज्यातून एकही उद्योग इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नाही. तसेच उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण करून राज्यात वैविध्यपूर्ण औद्योगिक विकास करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सीआयआयच्या सहकार्याने काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रमुख उद्योगपतींच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी उपस्थित उद्योजकांनी महाराष्ट्रातील औद्योगिक वातावरण अनुकूल असून नवीन शासनाकडून उद्योगांच्या समस्यांचे अधिक गतीने निराकरण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांमध्ये काही कारणांमुळे काही उद्योग राज्याबाहेर गेले आहेत. परंतु आता एकही उद्योग बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे बाहेरील राज्यांमधील चांगले उद्योगही महाराष्ट्रामध्ये कसे सुरु होतील यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, जमिनीची किंमत, वीज दर, रस्त्यांची तसेच इतर पायाभूत सुविधांची परिस्थिती आणि विविध परवानग्या गतीने मिळणे यासंदर्भात उद्योग विभागाला तसेच संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश देण्यात येऊन त्याप्रमाणे अडचणी दूर करण्यात येतील, असंही मुख्यमंत्री यांनी सांगितलं.

