विराट की स्मिथ? कुणाचा प्रवास सुरु आहे महान खेळाडूकडे

0 झुंजार झेप न्युज

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला. १-१ अशा बरोबरीत असलेल्या मालिकेत भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवला. भारताकडून 'हिटमॅन' रोहित शर्माने आव्हानाचा पाठलाग करताना धडाकेबाज शतक ठोकले. त्याला कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळीची जोड मिळाली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २८७ धावांचं आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने दमदार शतक ठोकले, पण भारताच्या रोहित-विराट जोडीने दमदार कामगिरी करत सामना जिंकला आणि मालिकेत २-१ ने बाजी मारली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेव्हा क्रिकेट मालिका रंगते, तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यात तुलना झाली नाही तरच नवल.
या मालिकेच्या नंतरही या दोघांमध्ये सर्वोत्तम कोण या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पाहूया या दोघांची तुलना करणारी आकडेवारी -
कसोटी क्रिकेट
कसोटी कामगिरीची तुलना केली तर विराट कोहलीने ८४ कसोटींमध्ये ५४.९७ च्या सरासरीने ७ हजार २०२ धावा केल्या आहेत. त्यात त्याने २७ शतके आणि २२ अर्धशतके लगावली आहे. तर स्टीव्ह स्मिथने ७३ कसोटी सामन्यांध्ये ६२.८४ च्या सरासरीने ७ हजार २२७ धावा केल्या आहेत. त्यात २६ शतके आणि २९ अर्धशतके यांचा समावेश आहे. याचाच अर्थ कसोटीतील कामगिरीच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथ सरस आहे.
मायदेश वि. परदेशातील कामगिरी
फलंदाजीच्या सरासरीची आकडेवारी लक्षात घेता घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळताना विराट कोहलीने ६८.४२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर स्टीव्ह स्मिथने ७१.१४ च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. परदेशातील कसोटी सामन्यातदेखील स्मिथच सरस आहे. विराटने परदेशी मैदानावर ४६.१२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर स्मिथने ६०.१५ च्या सरासरीने धावा जमवल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेट
विराट कोहलीची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी पाहता त्याने २४५ सामने खेळले आहेत. त्यात विराटने ५९.८५ च्या सरासरीने ११ हजार ७९२ धावा ठोकल्या आहेत. त्याने एकदिवसीय कारकिर्दीत ४३ शतके आणि ५७ अर्धशतके लगावली आहेत. त्या तुलनेत स्टीव्ह स्मिथने मात्र केवळ १२१ सामनेच खेळले आहेत. त्यात त्याने ४२.९६ च्या सरासरीने ९ शतके आणि २४ अर्धशतकांच्या बळावर ४ हजार ३९ धावा केल्या. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटच सरस असल्याचे दिसत आहे.
टी २० क्रिकेट
टी २० क्रिकेटमधील आकडेवारीचा विचार करायचा झाला, तर विराट कोहलीने ७८ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १३८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तर स्टीव्ह स्मिथने ३६ टी २० सामन्यात ५७७ धावा केल्या असून त्याचा फलंदाजीचा स्ट्राईक रेट १२८ आहे. कोहलीने २४ टी २० अर्धशतके झळकावली आहेत तर स्मिथच्या नावावर ४ टी २० अर्धशतके आहेत.
आता ही सगळी आकडेवारी पाहून तुम्हीच ठरवा कोण सर्वोत्तम खेळाडू.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.