अहमदनगर, 29 फेब्रुवारी : जामखेड शहरातील बीड रोडवर आठवडी बाजारात सकाळी 10 वाजता हवेत गोळीबार केला. जुन्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्व प्रकारानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
जामखेड शहराचा आठवडी बाजार दर शनिवारी भरत असतो. हाच बाजारा सुरू झाल्यानंतर आज एका कापड दुकानासमोर गोळीबार झाला. 15 दिवसांपूर्वी संबंधित आरोपीचे आणि समोरील गटामध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद आज पुन्हा उफाळून आला. एका युवकाने हवेत गोळीबार केला यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
गोळीबारानंतर बघ्यांची एकच गर्दी जमली होती.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याची नागरिकांमधून प्रतिक्रिया येत आहे. जामखेड शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आहेत. दोन वर्षापूर्वी याच बीड रोडवरील मार्केट यार्ड समोर गोळीबार होऊन दुहेरी हत्याकांड घडले होते. शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आसल्याने कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे चित्र दिसत आहे.

