राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी, अशी मागणी केलीय.
अहमनगर: कर्जत जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रोहित पवार यांनी जाहीर केलेले बक्षीस आर्थिक प्रलोभन असल्याचा आरोप राम शिंदेंनी केला आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, दबाव तंत्र वापरणे, पैशाचा पैशाचा वापर करणे, हे गैर आहे, असेही राम शिंदे म्हणाले.
बिनविरोध ग्रामंपचायतीला 30 लाखांचे बक्षीस
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीस लाखाचे जाहीर केले आहे. हे बक्षीस म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने रोहित पवारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राम शिंदेंनी केली आहे.
… तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील
रोहित पवार ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी तीस लाखांचा निधी जाहीर करत आहेत. मात्र, असंच सुरु राहील तर पुढील काळात टाटा बिर्ला देखील आमदार- खासदार होतील, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रलोभणं दाखवणं, लोकांवर दबाव तंत्र वापरणे, पैशाचा वापर करणे या गोष्टी चुकीच्या आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तीस लाखांचं बक्षीस जाहीर करणं हे घटना विरोधी असून, आचारसंहितेचे उल्लंघन करणारं आहे, असा आरोप राम शिंदेंनी केला.
ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत होत्या. सर्व्हरवरती लोड आल्याने अनेक ठिकाणी अर्जच भरले जात नव्हते. त्यामुळे काम अत्यंत मंदगतीने सुरू होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्याने अखेर मुंडे यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत दोन दिवस ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
15 जानेवारीला मतदान
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

