सचिन काळभोर विरुद्ध आमदार महेश लांडगे यांचा थेट संघर्ष

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी-चिंचवड महानगर पालिका प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपांतर्गत शह–काटशह

तिकीट कापण्यासाठी जोरदार हालचाली; जुने निष्ठावंत कार्यकर्ते सचिन काळभोर मैदानात, ‘मुंगूस–साप’ लढाईची चर्चा



पिंपरी–चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पक्षांतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे निष्ठावंत आणि जुने कार्यकर्ते सचिन काळभोर यांना निवडणुकीत उमेदवारी मिळणार की नाही, यावरून थेट आमदार महेश लांडगे आणि सचिन काळभोर यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर येऊ लागला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आमदार महेश लांडगे आणि सचिन काळभोर यांच्यात वादविवाद व राजकीय तणाव सुरू असून, आता हा संघर्ष थेट निवडणूक रणांगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आमदार महेश लांडगे यांनी सचिन काळभोर यांचा राजकीय काटा काढण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, काळभोर यांची उमेदवारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, सचिन काळभोर यांनीही दंड थोपटत निवडणूक रिंगणात ताकद लावण्याची तयारी केली असून, प्रभागात संपर्क वाढवणे, संघटन मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यावर भर दिला आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये काळभोर हे प्रबळ दावेदार मानले जात असून, त्यांच्या राजकीय भवितव्याची कसोटी येत्या निवडणुकीत लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आणि विशेषतः प्रभाग क्रमांक 13 मध्ये आमदार महेश लांडगे यांचे कट्टर विरोधक म्हणून सचिन काळभोर यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या संपूर्ण राजकीय संघर्षाचे वर्णन स्थानिक राजकीय वर्तुळात ‘मुंगूस आणि सापाची लढाई’ असे केले जात असून, एकीकडे आमदारांचे राजकीय वजन, तर दुसरीकडे निष्ठावंत कार्यकर्त्याची जिद्द — असा थरारक सामना प्रभाग क्रमांक 13 मध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आता सर्वांचे लक्ष भाजप नेतृत्वाच्या निर्णयाकडे लागले असून, सचिन काळभोर यांना उमेदवारी दिली जाणार की त्यांचा मार्ग रोखला जाणार, यावरच प्रभाग क्रमांक 13 मधील राजकीय गणित ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.