पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही; खडसेंचा भाजपला टोला
पवार साहेबांनी नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले तर तुमच्या मतदानाची गरज लागणार नाही. | Eknath Khadse
एकनाथ खडसे यांनी मंगळवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विधानपरिषदेतील आमदारकीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावेळी खडसे यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. पवार साहेबांनी नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले तर तुमच्या मतदानाची गरज लागणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्याला भाजपच्या गोटातून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कालपर्यंत अनेक लोक एकनाथ खडसे संपले असे म्हणत होते. मात्र, आता नाथाभाऊंनी एकच प्रकरण बाहेर काढले तर महाराष्ट्र हादरला. हे तर पहिलेच प्रकरण आहे, अजून कितीतरी प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात मोठी राजकीय गँग अडकली आहे. मात्र, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही जण नाही. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
एकनाथ खडसे मोठा घोटाळा बाहेर काढणार
भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळ्यांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या घोटाळ्यात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे, असा गौप्यस्फोट करतानाच ‘ईडी’ने कारवाई करावी असंच हे प्रकरण असून येत्या दोन दिवसात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
‘खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे’
मी संकट मोचक नाही. मी अडचणीतून मार्ग काढणारा आहे, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नेतृत्व मी स्वीकारलं आहे. आता खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच पवारांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी दणक्यात साजरा करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

