राज्य सरकार टिकवण्यासाठी कृषी कायद्यांवरुन शिवसेना, राष्ट्रवादीचे घुमजाव, कपिल पाटलांचा आरोप
राज्य सरकार टिकवण्यासाठी कृषी कायद्यांवरुन शिवसेना, राष्ट्रवादीने घुमजाव केल्याचा आरोप खासदार कपिल पाटलांनी केला.
पालघर : भाजप खासदार कपिल पाटील यांनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांवर टीकास्त्र सोडलं आहे. राजकीय फायद्यासाठी विरोधक कायद्याविषयी अपप्रचार करत असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील कपिल पाटलांनी टीकास्त्र सोडले. शिवसेनेने ही या कायद्याचं समर्थन केलं होत आणि ते आता विरोध करत आहेत. असं कपिल पाटील म्हणाले. शरद पवार कृषी मंत्री असताना या कायद्यात समाविष्ट असणाऱ्या तरतुदी लागू करण्याविषयी पत्रव्यवहार केला होता. ते ही या कायद्याचे समर्थन करत होते, याचा उल्लेख शरद पावर यांच्या आत्मचरित्रामध्ये असल्याचा दावा पाटलांनी केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्य सरकार टिकवयाचं असेल. त्यामुळे काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीने या कायद्यांना विरोध करण्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला. पालघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला. केंद्र सरकारने तयार केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मात्र, त्याची खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने हे आंदोलन सुरू असल्याचे कपिल पाटील म्हणाले. कृषी मालाची दलाली करणाऱ्या आडत्यांना या कायद्यामुळे दलाली मिळणार नसल्याने त्यांनी शेतकऱ्यांमध्ये चुकीची भावना पसरवून त्यांना आंदोलन करायला लावले, असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. हे आंदोलन फक्त हरियाणा,पंजाब प्रांतात होत असून इतर ठिकाणी का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बच्चू कडूंवर निशाणा
खासदार कपिल पाटील राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला. बच्चू कडू स्वतःच्या तालुक्यातील बाजार समितीत शेतकऱ्यांची उपेक्षा होत असतानाही त्याकडे लक्ष न देता दिल्लीतील आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी गेलेत. आंदोलनाला पाठिंबा देणे त्यांचा हक्क असला तरी स्वतःच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी आधी सोडविणे अपेक्षित होते, असा टोला कपिल पाटलांनी लगावला.
वाढवण बंदराला लोकांचा विरोध असेल आणि जनभावना प्रकल्पाच्या विरोधात असतील तर या जन भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचवणार असल्याचे कपिल पाटलांनी सांगितले. केंद्र सरकारला वाढवण बंदराबाबत विचार करण्यासाठी सांगू,अशी प्रतिक्रिया खासदार कपिल पाटिल यांनी दिली.

