पुण्यात तिशीतील तरुणाचा मृतदेह आढळला, ‘शिवप्रेमी’च्या टॅटूवरुन ओळख पटवण्याचे प्रयत्न

0 झुंजार झेप न्युज

 पुणे जिल्ह्यातील राक्षेवाडीत अंदाजे 30 ते 35 वर्ष वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. 

पिंपरी चिंचवड : पुण्यात तिशीतील तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याजवळ या तरुणाचा मृतदेह सापडला. तरुणाच्या हातावर ‘शिवप्रेमी’ असं लिहिलेल्या टॅटूवरुन मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मातीच्या ढिगाऱ्याजवळ बेवारस मृतदेह 

पुणे जिल्ह्यातील राक्षेवाडीत अंदाजे 30 ते 35 वर्ष वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. खेड तालुक्यातील राक्षेवाडी भागात आशानंद रेसिडेन्सी गृहनिर्माण सोसायटीच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडलेला सापडला होता.

दोन हातांवर दोन टॅटू

या बाबत खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी पाहणी करण्याचे काम सुरु आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम खेड पोलिसांनी सुरु केले आहे. तरुणाच्या एका हातावर ‘शिवप्रेमी’ असं लिहिलेला टॅटू गोंदवण्यात आला आहे. तर दुसऱ्या हातावर ‘विकास’ असं लिहिलेला टॅटू काढण्यात आला आहे. खेड पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पिंपरीत टॅटूवरुन हत्याकांड

पिंपरी चिंचवडमध्ये 8 ऑगस्टला तरुणाने आपल्याच जिवलग मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मयुर मडके या तरुणाने घटनेच्या महिन्याभरापूर्वी ‘एमएम’ असा टॅटू काढला. नंतर त्याचा मित्र मंगेश मोरेनेही त्याच आद्याक्षराचा पण थोडे वेगळे डिझाईन असलेला टॅटू काढला आणि वादाची ठिणगी पडली.

सारख्या टॅटूवरुन दहा वर्षांच्या मैत्रीत फूट

मयुर मडके आणि मंगेश मोरे हे दहा वर्षांपासून घट्ट मित्र होते. दोघांचे नाव आणि आडनाव ‘एम’ अक्षरावरुन येत असल्याने दोघांनी तसे टॅटू काढले. पण सारखे टॅटू काढण्यावरुन दहा वर्षांच्या मैत्रीत फूट पडली. जवळपास महिनाभर दोघांमध्ये धुसफूस सुरु होती.

टॅटू नंतर काढून घेतलेल्या मंगश मोरेने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मयुर मडकेची हत्या केली होती. पुण्यातील भोसरी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन आरोपी मंगेश मोरेसह सात जणांना बेड्या ठोकल्या. मंगेश मोरेसह सातही आरोपींनी हत्येची कबुली दिली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.