विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) सुनावणीवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) सुनावणीवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या प्रकरणात घोळ घालतंय त्यावरुन सरकारच्या मनात काय आहे तेच कळत नाही. काही पिटीशन दाखल होतात आणि मग त्यासाठी राज्य सरकार वेळ मागत आहे. राज्य सरकार या प्रकरणात काय करू इच्छिते ते लक्षात येत नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजप नेत्यांचं समाधान करण्यापेक्षा मराठा समाजाचं समाधान करा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांना लगावला आहे.
मराठा आरक्षण संदर्भातली जी स्थिती आहे केवळ सरकारच्या घोळामुळे आहे. सरकार ठामपणे एक भूमिका मांडत नाही. प्रत्येक वेळेस एक नवीन भूमिका मांडत आहे. सरकारच्या दोन मांडण्यांमध्ये प्रचंड फरक आहे. सरकारची कमिटी कुणाशी बोलते, काय निर्णय होतो काहीच कळत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सचिन सावतांना टोला
भाजपचं समाधान करण्यापेक्षा मराठा समाजाचं समाधान करा. तुमच्या नाकर्तेपणामुळं ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांचं समाधान करा. आमच्या समाधानाचा विषय तुम्ही सोडून द्या, आम्हाला तर कधी तुम्ही चर्चेलाही बोलावलं नाही. आमची तुमच्या विषयी काही तक्रार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा पण मराठा समाजाला न्याय द्या, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना दिले.
राज्य सरकारमध्ये प्रचंड मतभेद
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्य सरकारच्या हालचालींमुळे आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं पाहिजे, अशी परिस्थिती राज्य सरकारची दिसते. एमपीएससी आणि राज्य सरकारचा घोळ तयार झाला असून याला राज्य सरकार जबाबदार आहे, असंही फडणवीस म्हणाले.
भाजपमध्येच इनकमिंग होणार
पुणे महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक कुठेही जाणार नाहीत. उलट भाजपमध्येच इनकमिंग होणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपमधून 19 नगरसेवक पक्षांतर करणार या चुकीच्या बातम्या आहेत, असा दावा फडणवीसांनी केला.

