हिंजवडीमध्ये सताधाऱ्यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिल्यानं युवकांमध्ये नाराजी आहे.
पुणे : महाराष्ट्रातील 14 हजार 232 गावातील ग्रामपंचायत निवडणुका (Gram Panchayt Election) लागल्या आहेत. ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील गावांगावांमध्ये ग्रामंपचायत निवडणुकांचा फिव्हर चढला आहे. पुण्यातील आयटी नगरी हिंजवडी ग्रामपंचायतीमध्येही निवडणूक लागलीय. इथं सत्ताधाऱ्यांविरोधात युवकांनी दंड थोपटले आहेत. हिंजवडीमध्ये जुने विरुद्ध नवे असा सामना रंगला आहे.
सताधाऱ्यांचे ‘मी पुन्हा येईन’
आयटी नगरी हिंजवडीमध्ये गेल्या 10 ते 15 वर्षे सत्तेत असणाऱ्या सताधाऱ्यांनी ‘मी पुन्हा येईन’ हा नारा दिला आहे. दहा ते पंधरा वर्षे सत्तेत राहूनही पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या सत्ताधारी गटाविरुद्ध युवकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. यंदा होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी नवे विरुद्ध जुने असा थेट सामना पाहायला मिळतोय. हीच परिस्थिती आयटीनगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. आयटी नगरीतील प्रमुख माण, हिंजवडी, मारुंजी, कासारसाई अशा अनेक गावात यंदा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये युवकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून मोठे आव्हान निर्माण केले आहे.त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी जुने विरुद्ध नवे असा थेट सामना करणार असल्याचे चित्र पंचक्रोशीत दिसत आहे.
शिरूर (Shirur) तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतसाठी एकदम टाईट फिल्डिंग
शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीच्या 265 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप,शिवसेना,मनसे,काँग्रेस,वंचित आघाडी जनता दलाचे युवक कार्यकर्त्यांनी शड्डू ठोकले आहेत. गावकी-भावकी भोवती फिरणाऱ्या या निवडणुकीत आपल्या वर्चस्वासाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी एकमेकाविरुद्ध बाह्या सरसावल्याचे चित्र दिसत आहे.गावाच्या विस्ताराबरोबरच बाहेर लोकांचे मतदानही वाढलेले गावकी-भावकीचा राजकीय सामना बाहेरील मतांच्या कलावर निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत त्या दृष्टीने बाहेर लोकांची अधिकाधिक मते आपल्या बाजूने वाढवण्यासाठी गावोगावच्या कार्यकर्त्यांनी टाईट फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. यामुळे पुण्यातील गावांगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा फिव्हर पाहायला मिळत आहे. बदलत्या काळाप्रमाणं ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारामध्ये बदल पाहायला मिळतोय. पत्रकांच्या सोबतीला व्हॉटसअप मेसेजेच, व्हिडीओ याचा वापर वाढल्याचं चित्र आहे.

