संतप्त गट रस्त्यावर उतरला आणि त्यांनी पोलीस ठाण्यासमोरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली.
लातूर : जिल्ह्यातल्या उदगीर शहरात जमावाने वाहनांवर दगडफेक केल्याची भयंकर घटना घडलीय, या दगडफेकीत एसटी बससह अनेक खासगी वाहनांचं मोठं नुकसान झालंय. चार दिवसांपूर्वी पैशांच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीत जखमी झालेल्या एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त गट रस्त्यावर उतरला आणि त्यांनी पोलीस ठाण्यासमोरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली.
दोन गटांतल्या हाणामारीत जखमी झालेल्या उदगीर तालुक्यातल्या हैबतपूर येथील एका युवकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर चिडलेल्या जमावाने त्याचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला. बघता बघता लोकांची गर्दी झाली. याच गर्दीचा गैरफायदा घेत काही जणांनी वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले, तर काही जण जखमी झालेत. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात आलीय. मृत्युमुखी पडलेल्या युवकावर शांततेत अंत्यसंस्कार करण्यात आलेत. उदगीर शहरात सध्या शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केलेय.
ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान तुफान हाणामारी
ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान एका महिलेच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून उफाळलेल्या वादाचे रुपांतर चक्क दोन गटाच्या हाणामारीत झाले. धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील लंगाने गावात हा सर्व प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंगाने गावात एका महिलेने तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकलेल्या माहितीवरून वाद झाला. या वादाचे रुपांतर दोन गटांत तुफान हाणामारीत झालं होतं. या हाणामारीत दोन जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 22 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली होती.
भिवंडीत राष्ट्रवादी-शिवसेनेच्या दोन गटांत निवडणूक कार्यालयातच फ्री स्टाईल हाणामारी
भिवंडी तालुक्यातील निंबवली ग्रामपंचायत हद्दीतील गुळवी कुटुंबातील हाडवैर संपूर्ण तालुक्यास ठाऊक आहे. निंबवली ग्रामपंचायत सर्वश्रुत असताना ग्रामपंचायत निवडणुकीतून तो वाद पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला होता. निंबवली ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी आणि शिवसेनेचे प्रवीण गुळवी यांच्यात सरळ लढत होत असून, या निवडणुकीत दोन्ही गट पूर्व ताकदीनिशी उतरले आहेत. त्यानंतर दोन्ही गटांत वाद होऊन निवडणूक कार्यालयातच जोरदार हाणामारी झाली होती. याबाबत गणेश गुळवी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

