रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केलीय.
सांगली : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 25 जानेवारीपासून राज्यात एफआरपीच्या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. याच मोर्चाला सदाभाऊ खोत यांनी लक्ष्य केलं. राजू शेट्टी कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आता ते चोरांच्या आळंदीला पोहोचलेत, अशी टीका सदाभाऊंनी केली.
सदाभाऊ खोत म्हणाले, “काही मंडळी साखर कारखान्याच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. अशी मंडळी लोकांना दाखवण्यासाठी साखर कारखानदारांच्या विरोधात नाटकी आंदोलन करत आहेत. ते सरकारमध्ये आहेत. त्यांनी आंदोलन करण्याऐवजी ऊस शेतकऱ्यांना न्याय द्यावा. ते जमत नसेल तर सरकारमधून बाहेर पडावं.”
“एकाबाजूला सरकारमध्ये राहून दोन्ही हात तुपात ठेवयाचे आणि दुसऱ्या बाजूला लोकांना दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे. आता ते चोराच्या आळंदीला पोहचले आहेत. त्यांनी आता नाटकं बंद करावीत,” अशी अप्रत्यक्ष टीका सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर केली.
25 जानेवारीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून एफआरपी मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. याच मोर्चावर खोतांनी टीका केलीय.

