राज्यात लॉकडाऊन करण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कडाडून विरोध केला होता.
संगमनेर: राज्यात लॉकडाऊन करण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने थोरात बॅकफूटवर आले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी आणखी कडक निर्बंध राज्यात लागू करण्याबाबत सुतोवाच केलं आहे. त्यामुळे थोरातही तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनला अनुकूल असल्याचं बोललं जात आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी हे संकेत दिले आहेत. ते संगमनेर येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. राज्यात अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाची साखळी तोडून कोरोनाबळींची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. मृत्यूंची संख्या वाढते ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं थोरात यांनी सांगितलं.
मानवतेवरील संकट
लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचं अतोनात नुकसान होत आहे. ज्यांच्या हातावर पोट आहे, त्यांची अवस्था तर खूपच बिकट आहे. कोरोना हे जागतिक पातळीवरील संकट आहे. मानवतेवर आलेलं संकट आहे. त्यामुळे या संकटाला सर्वांना सामोरे जावं लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

