मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. मुंबईतील खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती 59 वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण तीन जणांचे बळी घेतले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने भर पडली आहे. राज्यात आणखी 15 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईतील 14 तर पुण्यातील एक आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 89वर पोहोचला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.
राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
राज्यातील वाढलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीबाबत सांगताना राजेश टोपे म्हणाले की, 'राज्यात एकूण 15 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 14 रूग्ण मुंबईतील आहेत, तर एक पुण्यातील आहे. यांपैकी 10 लोकांना संसर्गातून कोरोनाची बाधा झाली आहे. यांमध्ये रूग्णांच्या जवळच्या लोकांचा समावेश आहे.'
महाराष्ट्रात सध्या संचारबंदी लागू असूनही ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'महाराष्ट्रातील संचारबंदी ही कायदेशीर बाब आहे. त्यामुळे जर कोणी शिस्तभंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 'मीच माझा रक्षक, याचं पालन करून स्वतःची काळजी स्वतःच घेणं गरजेचं आहे. जर कोणी नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल.'

