उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यातील (Etah) एका गावात खळबळजनक घटना घडली आहे. एक पाकिस्तानी महिला येथील एका गावची सरपंच बनली आहे,
लखनौ : उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यातील (Etah) एका गावात खळबळजनक घटना घडली आहे. एक पाकिस्तानी महिला एटा जिल्ह्यातील एका गावची सरपंच बनली आहे, परंतु ती महिला सरपंच बनेपर्यंत कोणालाही याबाबतची कल्पना नव्हती. ही बाब एवढ्यापुरती मर्यादित नाही, कारण सरपंच बनण्यासाठी त्या महिलेने बनावट आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रदेखील बनवले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना मोठा झटका बसला आहे. सर्वांना प्रश्न पडला आहे की, त्या महिलेला निवडणूक लढण्यासाठी बनावट कागदपत्र, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र कुठून मिळालं?
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात राहणारी 64 वर्षीय बानो बेगम (Bano Begum) 35 वर्षांपूर्वी एटा येथील एका गावात तिच्या नातेवाईकांकडे आली होती. त्यानंतर तिने तिथला तरुण अख्तर अली याच्याशी विवाह केला. तेव्हापासून ती भारतीय व्हिसा (Long term visa) मिळवून भारतात राहात आहे. परंतु अद्याप तिला भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाही.
2015 च्या पंचायत समितीच्या निवडणुकीत विजय
2015 मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत (Panchayat Election) बानो बेगमने अर्ज दाखल केला होता, ती निवडणूक बानो बेगमने जिंकली. त्यानंतर पाच वर्षांनी जानेवारीमध्ये गावच्या सरपंच शहनाज बेगम यांचं निधन झालं. त्यानंतर काहीच दिवसांत बानो बेगमने काही राजकीय समीकरणे जोडली आणि गाव समितीच्या शिफारशीनुसार बानो त्या गावची सरपंच झाली. पोलिसांनी याबाबत सांगितले की, बानो सातत्याने तिच्या व्हिसाचा कालावधी वाढवत इथेच राहात आहे. इथे राहता-राहता ती गावच्या सरपंचपदापर्यंत पोहोचली आहे.
महिलेविरोधात चौकशीचे आदेश
गावातील एक स्थानिक नागरिक कुवैदन खान यांना या महिलेबाबत संशय आला. त्यानंतर त्यांनी त्वरीत याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांत तक्रार दाखल होताच सदर महिलेने तिच्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा पंचायत राज अधिकारी (DPRO) आलोक प्रियदर्शी यांनी एटा जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांच्यासमोर हे प्रकरण सादर केले आहे. त्यांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
महिलेला आधार कार्ड कसे मिळाले?
District Panchayat Raj Officer आलोक प्रियदर्शी म्हणाले की, बानो बेगमविरोधात मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ती पाकिस्तानची नागरिक असल्याचे आढळून आले आहे. तसेच तिने बनावट पद्धतींद्वारे भारताचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डदेखील बनवले असल्याचे उघड झाले आहे.
जिल्हा दंडाधिकारी भारती म्हणाले की, “ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी महिलेने आधार कार्ड व इतर कागदपत्रे कशी मिळविली याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामागे जो कोणी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच बानो यांना सरपंच म्हणून नियुक्त करण्याची शिफारस करणाऱ्या ग्राम सचिव ध्यानपाल सिंह यांनादेखील त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले आहे.

