औरंगाबाद नामांतर वादाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
औरंगाबाद: औरंगाबाद(Aurangabad) शहराच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यात यावे, यासाठी शिवसेना, भाजप आणि मनसे आक्रमक झाली आहे. औरंगाबादला जाणाऱ्या बसेसवरील बोर्डांवर संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला होता. नामांतराचा वाद पुन्हा उफाळल्यानं रेल्वेनं औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. नामांतर वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे विभागाकडून सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.
रेल्वे पोलीस फोर्सचे निरीक्षक अरविंद कुमार शर्मांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. रेल्वे पोलीस बल आणि जीआरपीचा बंदोबस्त रेल्वेस्थानकात वाढवण्यात आला आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेचे प्रभारी अधिकारी यांनी रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी फक्त तिकीट असणारांचा प्रवेश दिला जाईल, असं म्हटलं आहे.
2019 मध्ये काही युवकांनी रेल्वे स्टेशनमध्ये घुसून औरंगाबाद नावाच्या बोर्डाला काळे फासले होते. औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख फलकांवर करण्यात आला होता. तशा प्रकारचे आंदोलन पुन्हा होऊ नये म्हणून हा रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 1995 मध्ये औरगंबाद महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने औरंगाबाद महापालिकेचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा ठराव केला होता. काँग्रेसच्या एका नगरसेवकानं न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात ठरावाला आव्हान दिलं होतं.
औरंगाबादच्या नामांतरावरुन भाजप-सेनेत आरोप प्रत्यारोप
“शिवसेना म्हणजे नौटकी सेना”, “नामांतराचा विषय म्हणजे नाटक” आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. मुख्यमंत्री असताना औरंगबादला रस्त्यांसाठी पैसे दिले पण महापालिका वेळेत पैसे खर्च करु शकली नाही. इतकी वर्ष सत्ता राबवल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा काढला जातोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“पाच वर्षे भाजप आणि शिवसेना दोघांचे सरकार होते. शिवसेनेचे नेते तेव्हा राजीनामा खिशात घेऊन फिरायचे. मग तेव्हा राजीनामा का नाही दिला? आपल्या मुद्द्यांसाठी का प्रयत्न केला नाही? का पाठपुरावा केला नाही? किती पत्र दिले?”, असे सवाल त्यांनी केले.
"कितीतरी वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं कपोलकल्पित वचन आठवणीत राहील. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी विरोध केला सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेले”, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाबाबत 1988 मध्ये घोषणा केली होती. आता तुमहाला ठरवायचं आहे.
आमची मदत पाहिजे असल्यास भाजप म्हणून आम्ही मदत करू. बैठक बोलवा. तुम्ही जेवढा वेळ म्हणाल तेवढा वेळ देऊ. प्रश्न शहराच्या नामकरणाचा नाही. यातील गंभीरता समजून घेतली पाहिजे. औरंगजेब आक्रमणकरी होता. तो स्वतःला गझी म्हणायचा”, असं मुनगंटीवार म्हणाले.

