महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
नागपूर: शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या (Aurangabad mahanagar palika ) नामांतराचा मुद्दा आठवतो, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. आतादेखील महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने शिवसेनेकडून (Shivsena) औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की, शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ते शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेतला. काँग्रेसने संभाजीनगर नावाला विरोध केला काय किंवा नाही काय, पण शिवसेना हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता वापरत आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्तीचा सुरु असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.
तसेच फडणवीस यांनी यंदाच्या वर्षात राज्य सरकार शेतकरी आणि मजुरांना मदत करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. 2020 हे वर्ष आव्हानात्मक होतं, 2021 हे वर्ष सुखा समाधानाचं जावो हीच शुभेच्छा असल्याचेही फडणवीसांनी म्हटले.
नाव बदल हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील : बाळासाहेब थोरात
राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असं थोरात म्हणाले. औरंगाबादच्या नामकरणाचा वाद पुन्हा एकदा पुढं आला असताना बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती.
औरंगाबादच्या नामकरणाचा वाद
स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग मध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले.
यामध्ये ‘आय लव्ह औरंगाबाद’, ‘लव्ह प्रतिष्ठान’, ‘लव्ह खडकी’ असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘सुपर संभाजीनगर’ असा डिस्प्ले तयार केला होता.

